मंगळवार, ३१ मे, २०११

दत्ता म्हणे

पुत्र. बंधु, कांता, मज भ्रमविती।
भुललो मी चित्ती, विषयांच्या।।
संसाराचे सुख, गोड वाटे जीवा।
भुललो केशवा, नाठवेना।।
विश्वस्वप्न साच, दृढावले मनी।
काढेल यातुनी, कोण मज।।
दत्ता म्हणे माझा, असे भोळा भाव।
सद्गुरु सावेव. धाव घेई।।

                .....डीसिताराम

गुरुवार, २६ मे, २०११

दत्ता म्हणे

नाशिवंत हा संसार।
नाम हेचि जिवा सार।।
आवडिने नाम घ्यावे।
सदा सर्वकाळ ध्यावे।।
हेचि औषध सर्वांशी।।
भवरोग तुडविशी।।
दत्ता म्हणे सार सार।
करी संसारी उद्धार।।

भारवाही मी संतांचा।
बोलतसे त्यांची वाचा।।
मज नसे आत्मज्ञान।
असे हिनाहुनी हीन।।
बाप कौतुके शिकवी।
तेचि लेकुरे वदवी।।
दत्ता शरण संतांशी।
काया अर्पियेली त्याशी।।

काम क्रोध दंभे, छळिताती सारे।
पुढे अहंकारे, माज केला।।
मी-तू पण माझे, संसारी भ्रमलो।
धनापाठी गेलो, वाया जनी।।
विश्वस्वप्न सत्य, दृढ वाटे मना।
चित्त ही वासना, नाशियेली।।
जन्मोजन्मी कर्म, भोग पाठी आले।
मज भ्रमविले, याच जन्मी।।
दत्ता म्हणे जीव, होई कासाविस।
संसाराचा भास, जीव घेई।।

झालो मी आंधळा गा। संसारी भ्रमतांना।।
गात्रे शक्ति हरपली। पुढे मज चालवे ना।।
कोणीतरी हात धरा। मार्ग मज दाखवा ना।
काया ही थकली गा। दुःख भोगितो नाना।।1।।
आंधळ्याशी दया करा। भीक मागितो तुम्हा।
तुम्ही संत मायबाप। द्यावे अभय आम्हा।।धृ।।
विषय सुखे छळती गा। काम वासना भारी।।
क्रोधे मी पंगु झालो। कोण यातुन तारी।।
जन्मभोगे घात केला। आलो दुःखाच्या दारी।।
ज्ञान, ध्यान कोठे गेले। बुद्धि भ्रमियेली भारी।।2।।
साधूसंता निंदा केली। जीव्हा थोर बाटली गा।।
नाही आठवला देव मनी। नाही केले तीर्थाटण गा।।
दानपुण्य करवेना। माय बापा छळले गा।।
विकारांचा दास झालो। चित्त माझे नागवले गा।।3।।
जन्म मृत्यू चक्र थोर। सारे भरडुनी जाती।।
माझे माझे म्हणणारे। कालप्रवाही पडती।।
दुःख भ्रांति पडे जीवा। नाही तयास गति।।
परनिंदे भ्रष्ट झालो। नासे कर्तव्य जगती।।4।।
दत्ता म्हणे जागे व्हारे। प्रभु सोयरा करा।।
नाम मुखी घेऊनिया। जन्म पावन करा।।
पुन्हा नको जन्मभोग। चुकवी येरझारा।।
हाचि जन्म शेवटला। बापा परत फिरा।।5।।

                  .....डीसिताराम

बुधवार, २५ मे, २०११

दत्ता म्हणे

हरि माता हरि पिता।
भवताप हरविता।।
घालु तयावरी भार।
करु प्रेम अनिवार।।
नाही तया मानपान।
प्रेमे घेतो उचलुन।।
दत्ता म्हणे ऐसा हरि।
अंतर्बाह्य वास करी।।

हरि स्मरा हरि स्मरा।
क्लेश जाती दिगंतरा।।
तुटे बंधन काळाचे।
नामघोष करा वाचे।।
अति आदरे पुजावे।
नाम प्रेमे घ्यावे घ्यावे।।
ठेऊ नका लाज मनी।
हरि स्मरा जनीवनी।।
दत्ता सांगतो सर्वांशी।
जाई शरण हरिशी।।

नको नको ज्ञान जळो अभिमान।
सोडी मी तु पण अवगुण।।
शुद्ध भक्ति प्रेम शुद्ध भोळा भाव।
आवडे सदैव ह्रषिकेशा।।
नामसंकीर्तन टाळ वीणा हाती।
संतुष्ट श्रीपती तयालागी।।
दत्ता म्हणे आम्ही प्रभुची लेकरे।
प्रेमाने आदरे स्मरतसे।।

स्थिरावली वृत्ती विठ्ठलाच्या पायी।
कवण्या उपायी नये मागे।।
नासे चित्तभ्रम नासे मी तु पण।
अनुभवे जाण निजवृत्ती।।
शब्द पांगुळले मन हे सरले।
नाही ना उरले अहंभावा।।
दत्ता देखे डोळा मूर्ति विश्वंभर।
पाही चराचर पांडुरंग।।

            .......  डीसिताराम

सोमवार, २३ मे, २०११

दत्ता म्हणे

विश्वरुप हरि, जवळी अंतरी।
राहे चराचरी, कौतुकाने।।
हरि नये दाविता, बोलता सांगता।
परि एक चित्ता अनुभवा।।
शुद्ध प्रेमे करी, सुखाचा विलास।
संसाराचा भास, दुर करी।।
दत्ता म्हणे यांशी, जाणावा सत्वर।
मन हे माघार पहुडले।।

हरिरंगी मन, रंगले रंगले।
हरिशी देखीले, अंतर्बाह्य।।
धाव ही खुंटली, बाहेरी बाहेरी।
हरि नाही दुरी, ह्रदयात।।
मन पांगुळले, विषय अंतरी।
सकल श्रीहरि, व्यापलासे।।
दत्ता भोगतसे, भक्तिचा आनंद।
विठ्ठलाचा छंद, जडे जीवा।।

                ......डीसिताराम

रविवार, २२ मे, २०११

दत्ता म्हणे

खरा देव लुप्त झाला।
भ्रष्टाचार झाला देव।।
भ्रष्टाचारी थोर झाले।
नागविले गरीबांशी।।
पैसा भुखंडाचा ग्रास।
करी वास महालात।।
बॅंका पोट फुगवुनी।
किती मनी माज तया।।
दत्ता म्हणे ऐशा नरा।
ठेचा मारा तुडवुनी।।


कलियुगी नाम जपा।
आहे सोप्याहुनी  सोपा।।
तेणे तुटेल बंधन।
होई काळाचे खंडण।।
थोर संत कीर्ति गाती।
ऐशी नामाची महती।।
दत्ता म्हणे नाम घेऊ।
नाम घेता उगे राहु।।


भक्ति मुक्ति नामापाशी।
प्रेमे स्मरावे हरिशी।।
भव बंधन मोचक।
नाम तारक तारक।।
नामे दोषांचे हरण।
नामे मोक्षाचे भरण।।
दत्ता म्हणे नाम जपा।
तोचि मार्ग आहे सोपा।।

             ...........डीसिताराम



शनिवार, २१ मे, २०११

आश्रम व्यवस्थेचे चार कलंक

1. कर्मत्यागी गृहस्थः- जो गृहस्थ धर्मात राहुन त्यास प्राप्त झालेले कर्म न करता फक्त कालापव्यय करत असेल,
2. व्रतत्यागी ब्रह्मचारीः- जो ब्रह्मचारी असेल, पण ब्रह्मचर्य व्रताचा पालन करत नसेल तर त्याचे ते ढोंगच होय.
3. गावात रहाणारा तपस्वीः- तपस्वी म्हणजे वानप्रस्थात प्रवेश केलेला. असा जो कोणी असेल त्याने गावात राहु नये. जनसंपर्कापासुन दुर रहावे. पण जो गावातच राहुन लोकांच्या संसारात लुडबुड करत असेल तर ते त्याचे ढोंगच होईल.
4. इंद्रियलोलुप संन्यासीः- हल्लीचे बाबा स्वतःला संन्यासी, योगी, अवतारी म्हणवुन घेतात व वासनेच्या अधिन राहुन समाज कार्याचा आव आणतात, कोट्यवधी रुपयांची माया जमवतात. अबलांवर बलात्कार करतात. आव संन्यासाचा पण कर्म मात्र अश्लिलतेचे, अशा बाबा महाराजांना कोणते नाव द्यावे तेच कळत नाही. समाज मात्र यांकडे कसा ओढला जातो, हे मात्र गुढ आहे. बाबांच्या शिष्य संप्रदायात भगिनी वर्गच जास्त आढळुन येतो. हा प्रकार भयावह आहे. समाज मानसिक रोगाने पछाडला जात आहे, हे मात्र खरे आहे. असे ढोंगी बाबा म्हणजे आपल्या समाज व्यवस्थेला लागलेली किडच आहे. ही कीड वेळीच ठेचली नाही तर मात्र आपले काही खरे नाही.

हे चारही आश्रमव्यवस्थेचे कलंक आहेत, आणि व्यर्थ आश्रम आचरणाचा देखावा करणारे मुर्ख आहेत. समाजाने या चारही मुर्खांना हद्दपार केले पाहिजे.

                                                                   .................  डी सिताराम

मनाचा निग्रह

ज्यांस आपल्या मनावर विजय प्राप्त करावययाचा असेल, त्याने आसक्ति व परिग्रहाचा त्याग करुन संन्यासी वृत्ती ठेवावी व एकांतात राहुन त्याने जेवण व निद्रा अल्पशी ( परिमित ) घ्यावी. पवित्र आणि सपाट जमिनीवर आसन टाकुन स्वच्छ मनाने त्यावर बसुन ओमकारचा प्रथम मोठ्याने व नंतर मनातल्या मनात जप करावा. दृष्टी नासिग्रावर ठेऊन पुरक, कुंभक व रेचक द्वारा प्राण आणि अपानाची गति नियंत्रण करावी, मनातल्या चित्तवृत्ती जेथे जेथे जातील तेथ तेथुन विद्वान पुरुषाने त्यावृत्ती खेचुन ह्रदययात थोपवाव्यात. प्रथम असे करणे कठिण जाईल, पण सवयीने ते सहज साध्य होईल. कारण असाध्य ते साध्य, करिता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे।। असा सतत अभ्यास करीत गेल्याने मनातील वृत्ती या मनातच थांबल्याचा अनुभव येईल. ज्याप्रमाणे इंधन संपल्यावर अग्नि आपोआपच विझुन जातो, त्याचप्रमाणे थोड्याच वेळात चित्त हे शान्त होऊन जाते. अशाप्रकारे मनातल्या वृत्ती या जेव्हा अत्यंत शान्त होतात, त्यावेळेला चित्त ब्रह्मानंदात विलिन होते अणि मग चित्तवृत्ती या परत उसळत नाहीत. असा साधक संसारातील सुख-दुःखाने विचलीत होत नाही. तो सदा आनंदी रहातो. कारण सर्व अनर्थाचे मुळ हे आपले मनच होय. या मनाच्या चंचलतेमुळे आपण संकटात सापडतो व आजचा आनंद हरवुन बसतो. करीता मनावर विजय प्राप्त करणे अपरिहार्य ठरते. त्यासाठी वरील साधना प्रत्येकाला सहजच करण्याजोगी आहे. पाहिजे फक्त मनाचा निश्चय.

                                    ......... डी सिताराम

शनिवार, १४ मे, २०११

हे लक्षात ठेवा

8शिष्यास अनुग्रह दिल्यावर सद्गुरु शिष्यांची वेळोवेळी चौकशी करतात. त्यांच्यात नामाबद्दल गोडी उत्पन्न करतात. नाम दिल्यानंतर जो अनुभव येतो त्या अनुभवाच्या वरच्या अवस्थेत नेण्यास शिष्यांस उत्तेजन देतात. शिष्यांची खरोखर उन्नती होते आहे की नाही, यावर त्यांचा भारी कटाक्ष असतो.
8खरे सद्गुरु हे शिष्यांस भक्तियोग, ज्ञानयोग व कर्मयोगाची सांगड कशी घालावी हे शिकवतात. तसेच त्यांना स्वधर्म समजाऊन सांगतात.
8खरे सद्गुरु हे शिष्यांना अंधश्रद्धेपासुन दूर ठेवतात.
8खरे सद्गुरु शिष्यांस ज्ञान देऊन प्रबोध देतात व त्यांना विश्वस्वप्नातुन जागे करतात. आत्मदर्शन घडवुन आणतात.
8खरा शिष्य गुरुंनी दिलेले नाम मोठ्या श्रद्धेने घेतो.
8खरा शिष्य हा गुरुंचा आदर करतो व मनात आलेले सर्व संशय गुरुंजवळ मनमोकळेपणाने सांगुन शंका निरसन करुन घेतो.
8खरा शिष्य हा गुरुंनी सांगितलेल्या ज्ञानाचे चिंतन करुन प्रयत्नाने ज्ञानात भर घालतो. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, योगवाशिष्ठ, दासबोध, उपनिषदे व महाभारत यांसारख्या पवित्र ग्रंथाचे नियमित वाचन व मनन करतो.
8प्राप्त झालेला अनुभव गुरु किंवा अधिकारी व्यक्तिंखेरीज कोणाला सांगु नये.
8बद्धतेकडुन मोक्षाकडे, सगुणत्वाकडुन निर्गुणत्वाकडे वाटचाल करायची असल्यामुळे शिष्याने नामसाधना अत्यंत सुक्ष्मत्वाने करावी. तसेच गुरुंच्या देहाकडे न पाहता गुरुंचे विश्वव्यापक रुपाकडे लक्ष ठेऊन ज्ञानसाधना चालु ठेवावी. 
 
8एकवेळ गुरुंचा विसर पडला तरी चालेल पण त्यांनी जी साधना व जे नाम दिलेले आहे कोठल्याही परिस्थितीत सोडु नये.
8गुरुंची महती एकदा समजल्यावर त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवा व त्यांच्या कार्यास हातभार लावावा. त्यांचे विचार तळागाळातील सर्वस्तरीय बांधवांपर्यंत पोचविण्याचे पवित्र कार्य करा.

8नवा व बलवान भारत घडवा.
8संतांच्या चमत्कारांकडे लाक्षणिक अर्थाने पाहा. त्या चमत्कारात गुंग होऊ नका,

8स्वतः स्वधर्म आचरुन दाखवा तसेच दुसऱ्यांनाही आचरण्यास सांगा.
8कोणावरही अन्याय करु नका व कोणाचाही अन्याय सहन करु नका तसेच अहिंसेचा अतिरेक करु नका.

8प्राचिन काळातील ऋषी-मुनींच्या तत्वज्ञानाचा अर्थ वैज्ञानिक दृष्टीकोनातुन समजुन घ्या व तसे वागण्याचा प्रयत्न करा. 
8अंधश्रद्धा मनी कवटाळुन ठेऊ नका. डोळस व्हा.

8स्रियांना मान देण्यास शिका. ज्या घरात वा ज्या देशात स्रियांना योग्य मान दिला जातो, तेथे स्वधर्म, नीति, संपत्ती व खरा परमार्थ वास करीत असतो हे लक्षात ठेवा.
8जेथे स्रियांना उपभोग्य वस्तु म्हणुन बघितले जाते तेथे अज्ञान, अविद्या, अधर्म व अवदसा वास करतात. असा विकारी जनांचा अधःपात हा ठरलेलाच असतो. असा व्यक्ति कधीच सुखी नसतात हे लक्षात ठेवावे.

8सवड काढुन पंढरपुर, आळंदी, शिर्डी, गाणगापुर यासारखी पवित्र तीर्थयात्रा करा. आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करु नका. साधा व भोळा भावच ईश्वराला आवडतो. 
8थोर पुरुषांची भेटीगाठी घ्या. त्यांचा आशीर्वाद घ्या. संतांची अभंगे पाठ करा.

8एकादशी नियमित करा. जमेंल तर आरत्या, हरिपाठ नियमित म्हणण्याचा परिपाठ चालु करा. नियमांचे पालन करा. नियम अंगी बाणा. लहान मुलांना शुभ संस्कार देऊन घडवा. 
8घर अंगण परिसर स्वच्छ ठेवा.
8दारु, तंबाखु, मद्यपान, मांसाहार, परद्रव्य व परदारा यांपासुन दूर राहा. कोठलेही व्यसन करु नका.
8दुसऱ्या बांधवांनाही अध्यात्माचा मार्ग दाखवा. त्यांनाही अनुग्रह घ्यायला सांगुन परमार्थावर वाटचाल करायला सांगा.

8चमत्कार व बुवाबाजीवर विश्वास ठेऊ नका.

8ज्ञानी व्यक्तिंचा सहवास करा.

8भगवंताचे वेळोवेळी स्मरण करीत चला. जेंव्हा जेंव्हा तुमचे मन संसारातील गोष्टींकडे भरकटत जाईल तेंव्हा तेंव्हा त्यास प्रयत्नपुर्वक खेचुन भगवंताकडे लावा. हळुहळु सवय झाल्यावर ते आणखी कशातही गुंतणार नाही.

8परस्री व परधन यापासुन जाणिवपुर्वक दूर राहा.

8वेळोवेळी गुरुंचा सहारा घ्या. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वाटचाल करा. भक्तिमार्ग सोपा व सरळ आहे. कोणालाही कोणत्याही वयात तो सहज करण्याजोगा आहे. पण तो मार्ग गुरुंकडून नीट समजुन घ्या. कारण शुद्ध मार्ग फक्त सदुगुरुच सांगु शकतील.

8सतत गुरुंवर अवलंबुन राहु नका. त्यामुळे परावलंबी होण्याची शक्यता जास्तच. स्वतः विवेकाने व ज्ञानपुर्वक वागल्यास वैराग्य व भक्ति ही दृढ होत जाते व तीच खरी गुरुसेवा होय.

8स्वतःचे निर्णय स्वतः घ्या.

8तुमचे मन जसजसे अध्यात्मात प्रगत होऊ लागेल तसतसे विकार उसळुन तुमचा मनक्षोभ होईल. अशा वेळी धीर व संयम ठेवा. इंद्रियांच्या आहारी न जाता तटस्थ भावाने व साक्षित्वाने स्वतःचे परिक्षण करा.

8जग हे परिवर्तनशिल आहे, पण म्हणुन संसार हा अर्धवट सोडु नका. आपल्या वाट्याला जे भोग प्राप्त झालेले आहेत ते निमुटपणे स्विकारा.

8वेळोवेळी ध्यान करा. त्याचबरोबर स्वतःचेहि परिक्षण करा. आपल्या चुका ओळखुन त्यावर मात करा.

8खरा साधु निसर्ग नियमात ढवळाढवळ करत नाही. तो निसर्गाने आखुन दिलेल्या चौकटीत आनंदाने रहातो.

8रंजल्या गांजल्यात ईश्वर पहा. समाजातील तळागाळातील बंधुंची  जमेल तितकी निस्वार्थी भावनेने सेवा करावी.

8खरा साधू ओळखुन त्याची भक्तिभावाने पूजा करावी. तसेच शत्रु ओळखुन त्याला वेळीच ठेचण्याचे वा प्रतिकार करण्याचे धारिष्ठ दाखवावे. दास्यत्व ईश्वराचे स्विकारावे. स्वतःच्या स्वार्थासाठी उठसुठ कोणाचे पाय धरु नये.

8उठा...... वेळ थोडा आहे. कार्य जास्त आहे. यश तुमचेच आहे. सद्गुरु सदैव तुमचे रक्षण करोत. तुमची अध्यात्मिक प्रगती होवो व स्वधर्मावरील वाटचाल ही सुखकर होवो. तुमचे मंगल होवो

                                             ......डी सिताराम


 




 










 


 


 

 










अनुग्रह- एक विज्ञान


अनुग्रह
अनुग्रह कोण देऊ शकतो?
दर्शनात् स्पर्शनात् शब्दात् कृपया शिष्यदेहके।
जनयेद्यः समावेशं साम्भव स हि देशिकः।।
         योगवासिष्ठ- (निर्वाण प्रकरण)
अर्थः- जे दर्शनाने, स्पर्शाने, शब्दाने व कृपापुर्वक शिष्यांच्या देहामध्ये शिवभावाची मंगलमय अनुभूति करु शकतात त्यांनाच श्रीसद्गुरु असे म्हणतात.
अशी सद्गुरुंबद्दलची स्पष्ट व्याख्या वशिष्ठ मुनींनी केलेली आहे. जे कोणी या पदाला आरुढ झालेले असतात ते शिष्यांना उत्तम प्रकारे अनुग्रह देऊन त्यांना मोक्षाचे अधिकारी बनवतात.
जे आत्मज्ञानी असतात, जे विश्वस्वप्नातुन जागे झालेले असतात, ज्यांचे दोष पुर्णपणे नाहिसे झालेले असतात, जे आत्मस्वरुपावर निरंतर जागे असतात असे सद्गुरुच शिष्यांना अनुग्रह देऊ शकतात.
जे आत्मज्ञानाच्या किंवा, अनुग्रहाच्या मोबदल्यात काहिही न घेता निस्वार्थ भावनेने समाज सदृढ व्हावा या उद्देशाने अनुग्रह देतात तेच खरे सद्गुरु होत. व अशाच आत्मज्ञानी महापुरुषांकडुन अनुग्रह घ्यावा.
जो प्रसिद्धी पासुन दूर रहातो, लोकांच्या निंदेने वा स्तुतीने विचलित होत नाही, जो मान अपमान समान मानतो, ज्यास समत्व योग प्राप्त झालेला आहे, तोच खरा सद्गुरु व अशाच सद्गुरुंकडुन अनुग्रह घ्यावा.
ज्यांच्या मनात शिष्यांविषयी कळकळ असते, जे शिष्यांच्या उद्धाराची काळजी वाहतात, शिष्यांना या भयानक संसार सागरातुन तरुन जाण्यासाठी यथार्थपणे मार्गदर्शन करतात तेच खरे सद्गुरु व खरे संत होत. व अशा संतांच्या समागमाने संसार सागर पार केला जातो व आपण आपल्या कर्माशयाचा नाश करु शकतो. अशाप्रकारे सद्गुरुंच्या वचनावर दृढ विश्वास ठेवल्याने आपण मुक्त होऊ शकतो.
खरे सद्गुरु आपणाला ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग शिकवतात व आपल्याला त्यांच्या इतकेच परिपुर्ण करुन सोडतात. 
संत समागमु धरावी आवडी। जाशी पैलथडी भवसिंधू।।
संतांचे वचन अंतरी लक्षुनी। आपुल्या जीवनी मुक्त होशी।।
संत हेची बाप संत हेची माय। भक्तालागी सोय सर्वकाळी।।
संत उपदेश हाची गीता सार। कैवल्याचा भार दत्ता म्हणे।।
हल्ली मात्र गुरु म्हणविणाऱ्यांचा सुळसुळाटच झाला आहे. ते स्वतः आत्मदृष्टीने निजलेले असुन बाहेर वैराग्याचा देखावा उभा करुन शिष्यांना अनुग्रह देऊ पाहतात. स्वतः विश्वस्वप्नातच गुंग राहुन शिष्यांना विश्वस्वप्नातुन जागे करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात व शिष्यपण विश्वस्वप्नातुन जागे झाल्याच्या गप्पा मारतात. स्वतःला आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार झाल्याचे सांगतात. स्वतःची प्रसिद्धि करतात. हे सारे भयावह आहे. यामुळे समाजाचे भले न होता नुकसान मात्र होते. समाज भलत्याच शक्तिकडे ओढला जातो. हे सारे थांबायलाच पाहिजे. जन्मोजन्मीची अविद्यारुपी महामारी नाश न करता पुन्हा विश्वस्वप्नातच गुंग रहाणाऱ्याला कोणते नाव द्यावे तेच कळत नाही. त्यामुळे सुज्ञांनी गुरु निवडतांना डोळे उघडे ठेवुनच निवडावा. कोणाच्याही सांगण्यावर विश्वास न ठेवता स्वतः जागरुक राहुन सद्गुरुंची परिक्षा घ्यावी. तरच गुरु करावा. बरेच विद्वान माझ्या या विधानाला हसतील. त्यांना हसण्याचे काम करु द्या. आपण आपले काम मात्र चोखपणे करा.
सदुगुरु कसे असतात?
गुरु चरणांची शोभा। भोळा राजा असे उभा।।
याशी नाही मानपान। दिले नामाचे साधन।।
नामरुप ऐक्य करी। भवव्याधी दूर सारी।।
दत्ता म्हणे माझा भाव। गुरु जाहला स्वभाव।।
भगवान रामकृष्ण म्हणत- साधू दिवसा ऐकावा व रात्री पहावा तरच त्यावर विश्वास ठेवावा. या त्यांच्या सांगण्यात खूपच सत्य सामावलेले आहे.
ज्यास  घरादाबद्दल  मोह, ममत्व किंवा  आसक्ति नसते, सर्व लोकांत जो निःसंग वृत्तीने रहातो, जो मायेत कधीही बांधला जात नाही, जो परब्रह्माची नियमित उपासना करतो, जो भगवंताचे नियमित गुणवर्णन करतो असा भक्तिमान सत्पुरुष म्हणजेच खरा ज्ञानी सदुगुरु होय. अशा भक्तिमान सद्गुरुंकडुनच अनुग्रह घ्यावा.
जे बोले तैसा चाले या वृत्तीवर आरुढ असतात, जे शिष्यांना अध्यात्म शिकवतांना विज्ञानाचेही रहस्य समजाऊन सांगतात असे श्रेष्ठ अधिकारी पुरुष म्हणजेच सद्गुरु होय व अशाच ज्ञानमय, विज्ञानमय सद्गुरुंजवळुन अनुग्रह घ्यावा.
जे लोकोपवादाने हर्षित वा दुःखी होत नाहीत, जे संयमी व ब्रह्मचारी असतात, ज्यांची दृष्टी सदा पवित्र व स्वच्छ असते, परद्रव्य व परदारा यांच्याबद्दल ज्यांना आसक्ति नसते, जे कर्म करत असतांना निष्काम कर्मयोग साधतात, ज्यांचे शरीर, मन, वागणे व बोलणे हे नादमय झालेले असते अशा निष्काम कर्मयोगी सद्गुरुंकडुनच अनुग्रह घ्यावा.
जो कोणी देवतांबद्दल शिष्यांच्या मनात भेद करत नाही. नाना संप्रदायांमुळे जो संशयात सापडत नाही, जो शिष्य शिष्यांमध्ये भेदभाव करत नाही. अशा जीवन्मुक्त पुरुषांकडुनच अनुग्रह घ्यावा.
जे निस्वार्थी व परोपकारी असतात, जे शिष्यांच्या पारमार्थिक उन्नती बरोबरच राष्ट्राची उन्नती होण्यासाठी झटत असतात. जे खऱ्या अध्यात्मज्ञानाचा प्रसार होण्यासाठी कार्य करतात, जे खरा स्वधर्म जगाला समजाऊन सांगतात अशा राष्ट्रसंत महापुषालाच सद्गुरु म्हणावा. अशा राष्ट्रसंतांकडुनच अनुग्रह घ्यावा व अशाच सद्गुरुंकडुन अध्यात्म विद्येची धुळाक्षरे शिकावित. त्यांनाच मनोभावे शरण जावे. त्यांच्याजवळुन अनुग्रह घेतल्यास शिष्यपण त्यांच्या सारखाच प्रखर आत्मज्ञानी बनतो हे लक्षात ठेवावे.
                             
                                         ......डीसिताराम

















साधक भगिनींसाठी सुचना

साधक भगिनींसाठी सुचना
स्री ही देवीस्वरुप आहे तिला आदराने आदिशक्ती असे म्हटले आहे. कारण ती या साऱ्या त्रैलोक्याची जननी आहे. सारे भूतमात्र तिच्याच पोटी निर्माण झाले आहे. तिचा गौरव करायला आपण शिकले पाहिजे.
एकविसावे शकत उजाडले तरीही पुरुष आणि स्री यांच्यात समानता आलेली नाही. तिला नाना प्रकारे छळले जाते. तिच्याकडे केवळ उपभोग्य वस्तु म्हणुन पाहीले जाते. याकरीता भगिनींनी प्रथम स्वतःला बदलले पाहिजे. तिने स्वतःचा सम्मान केला पाहिजे. जी भगिनी सद्गुरुंकडे जाऊन अनुग्रह घेते, तिने तर स्वतःला अबला कधीच समजु नये. कारण तिची परमात्म्याशी एकतानता साधली जाते. नाम जपता जपता ती प्रत्यक्ष भगवंताला प्राप्त करुन घेते. प्रत्यक्ष पांडुरंग मागेपुढे उभा राहुन तिचा सांभाळ करतो. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, महाराणी ताराबाई, जिजामाता, महाभारत कालिन मैत्रैयी, द्रौपदी, उलपी इ. भाग्यवान स्रिया कणखर होत्या. कोणाचाही अन्याय त्यांनी सहन केला नाही. समाज कणखर व बलवान होण्यासाठी त्या आयुष्यभर झटल्या. प्रत्येक भगिनीने अशा तेजस्वी स्रियांचा आदर्श ठेवावा. असो.
प्रपंच करीत असतांना पांडुरंगाची सतत आठवण ठेवावी. मुलाबाळांवर अध्यात्मिक संस्कार करावेत. त्यासाठी सकाळ संध्याकाळ आरती, हरिपाठ, स्तोत्रे इ. नियमित म्हणण्याचा परिपाठ ठेवावा. मुलांचे फाजील लाड न करता, त्याच्या ममतेत न अडकता, प्रसंगी कठोर होऊन तो चुकल्यास त्यास त्याच्या चुकीचा जाणिव करुन द्यावी. योग्य वेळी मौन राखावे, मुलांना मांसाहाराचे वळण न लावता त्यास शुद्ध शाकाहाराचे महत्व सांगावे. उद्याची चिंता करु नये. सासु-सासरे, नणंद, दीर व पती यांच्याशी प्रेमाने वागावे. अन्याय सहन करु नये. अन्यायाचा शक्तीनिशी प्रतिकार करावा. शेजारणींशी सलोख्याचे संबध ठेवावेत. मनातील गुपीत मनातच ठेवावे. संसारातील न्यून, कमीपणा, मनातील शल्य चारचौघात सांगुन त्याचे प्रदर्शन करु नये.
स्रियांमध्ये शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, राम, कृष्ण यांसारखे तेजस्वी महापुरुष घडवण्याची शक्ती आहे. त्यामुळे भगिनीने स्वतःचा मान ठेवावा. स्री सुखी असेल तर घर-परिवार सुखी व समृध्द होईल. म्हणुन घरातील प्रत्येक पुरुषाने घरातील स्री वर्गाचा आदर व सम्मान करावा. कारण त्यात सर्वांचेच हित सामावलेले आहे.
पुरुषातील वाईट प्रवृत्ती स्रियांना ओळखता येते. त्यामुळे तिने त्या वाईट प्रवृत्तींना खतपाणी न घालता, उत्तेजन न देता त्यांचा निषेध करावा. वाईट प्रवृत्तींचा नायनाट करण्याचे सामर्थ तिच्याजवळ नक्कीच आहे.
नारींचा सन्मान ज्या घरात, ज्या गावात व ज्या देशात केला जातो, त्या घरात, त्या गावात व त्या देशात लक्ष्मी, स्वधर्म व परमार्थ वास करत असतात, तेथे अध्यात्म स्थिर असते.
भगिनी जर अशिक्षित व अडाणी असेल तर सज्ञान होण्याचा प्रयत्न करावा. मुलाबाळांना चांगले ज्ञान द्यावे. मुलांची अंघोळ करतांना प्रत्यक्ष पांडुरंगाचेच स्नान करीत आहोत असाच भाव ठेवावा. सारा परिवार व घर हे पांडुरंगाचेच निवास आहे असे चिंतन करावे. मुलांतील सद्गुणांना वाव द्यावा. समर्थ घर, समर्थ गाव व समर्थ देश घडवण्यास हातभार लावावा. म्हणतात ना.....
।।जिच्या हाती पाळण्याची दोरी। ती राष्ट्राते उद्धारी।।
साधक भगिनीने दैवावर हवाला न ठेवता, मुलांना दैववादी बनवु नये. त्यांना कर्तव्य व ज्ञानार्जन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. रामायण महाभारत यांतील विररसाच्या गोष्टी सांगुन त्यांचे मन बलवान करावे. भुताखेताच्या गोष्टी सांगुन त्यांना भित्रा व पळपुटा करु नये. व्यायामाचे महत्व सांगुन त्यांची शरीर संपदा वाढवावी. असे प्रत्येक भगिनीने मनापासुन आचरण केल्यास संसार हा सुसह्य होईल व ईश्वराची सेवा आपोआपच होईल यात संशय नाही.

                                                            ..........डी सिताराम












शुक्रवार, १३ मे, २०११

साधकाचे आचरण


साधकाचे आचरण
ज्या भाग्यवान शिष्याने सद्गुरुंकडुन अनुग्रह घेतला आहे, त्याने प्राप्त झालेले नाम कोठल्याही परिस्थितीत सोडु नये. गुरुवचनावर विश्वास ठेवावा. गुरुंच्या भेटीसाठी अवश्य जावे. गुरु आपल्या घरी आल्यावर सत्संगाच्या मिषाने प्रवचनादी ठेवावे. श्रवणाचा लाभ घ्यावा. इतर बांधवांना गुरुंचे दर्शन उपलब्ध करुन द्यावे. त्यात देखावा, वरवरपणा किंवा दांभिकपणा नसावा. स्वभाव नम्र ठेवावा. गुरुंचे प्रदर्शन करु नये. किंवा, गुरुंना चमत्काराच्या वलयात अडकवु नये. माझा गुरु खुप मोठा व श्रेष्ठ आहे, असे म्हणुन त्यांना लहान करु नये. कारण गुरु हे अद्वैत भुमिकेवर असतात. त्यांच्या दृष्टीपुढे लहान-मोठा, आप-पर, मान-अपमान आदि भाव नसतात. गुरुंची प्रसिद्धि करु नये. काही शिष्यांना आपल्या गुरुंबद्दल अवास्तव सांगण्याची सवयच असते. त्यामुळे गुरु या पदाविषयी सामान्य जनतेच्या मनाविषयी संशय निर्माण होतात, या कारणासाठी असे करणे टाळावे.
शिष्याने गुरुंजवळ घरादाराबद्दल रडगाणे न गाता त्यांच्या मार्गदर्शनाखाली नामजपात प्रगती करुन घ्यावी. काही शंका आल्या असतील तर त्यांच्याशी निःसंकोचपणे पत्रव्यवहार करावा. किंवा, प्रत्यक्ष भेटुन शंका निरसन करुन घ्याव्यात. प्रत्यक्ष गुरुंना शंका विचारल्यास शिष्य चटकन संशयरहित होतो. आपले अनुभव, किंवा, आपल्याला झालेल्या दिव्यदर्शनादि गोष्टी फक्त जाणकार साधकांजवळ किंवा आपल्या गुरुंजवळ सांगव्यात. ज्याला साधनादि, ध्यानयोगाचा अनुभव नाही अशा व्यक्तिंजवळ आपले अनुभव कधीही प्रगट करु नये. त्यायोगे अध्यात्ममार्गावरील आपली घसरण होते, व आपला मधुर भक्तिभाव नष्ट होतो. म्हणुनच दुर्जन, नास्तिक, संशयीत व्यक्तिंच्या संपर्कापासुन सदैव दूर रहावे. इतकेच नव्हे तर दांभिक भक्तांपासुनही चार पावले दूर रहावे.
दुसऱ्या गुरुंना भेटण्याचा योग आला तर अवश्य जावे. त्यांना मनोभावे वंदन करावे. त्यांचे देखील मार्गदर्शन घ्यावे. कारण आपल्या गुरुंचे गुरुत्व त्यांच्यात देखील असते, हे सदैव लक्षात ठेवावे. त्यांच्याजवळ आपल्या गुरुंचे दोष वा अवास्तव महत्व सांगु नये. किंवा, आपल्या गुरुंजवळ देखील दुसऱ्या सांप्रदायातील वा दुसऱ्या गुरुंचे दोष सांगु नये. कारण अशा प्रकारे शिष्य संशयात सापडतो. त्याचे मन क्षणोक्षणी चंचल बनते. असा शिष्य भित्रा वा पळपुटा बनतो. त्याचा गुरुंवरील विश्वास उडू लागतो.
आपला जो सांप्रदाय आहे तो आईप्रमाणे प्रेमळ, पित्याप्रमाणे ज्ञानी व सद्गुरुंप्रमाणे ब्रह्मज्ञानी असा आहे. म्हणुन ज्याप्रमाणे आपण आपल्या आई-वडिलांवर मनाप्रमाणे प्रेम करतो तसेच प्रेम आपण आपल्या सांप्रदायाबद्दल व आपल्या सद्गुरुंबद्दल ठेवावे. ज्याप्रमाणे आपण दुसऱ्यांच्या आई-वडिलांचा आदर करतो, त्यांच्याविषयी पूज्यभाव ठेवतो तसेच आपण दुसऱ्या सांप्रदायाबद्दल पूज्यभाव ठेवावा. यामुळे आपले मन गोंधळात पडत नाही व आपण संशयरहित होतो.
बरेच साधक दुसऱ्यांच्या सांप्रदायाला नावे ठेवतात, दुसऱ्या गुरुंबद्दल वाट्टेल ते बोलतात. हे सर्वथैव अयोग्यच आहे, हे सदैव लक्षात ठेवावे. दुसऱ्यांच्या सांप्रदायाबद्दल आपल्याला अस्वस्थ वा क्रोधित होण्याचे कारणच काय? त्यांना त्यांचे काम करु द्या. आपण आपले काम मात्र स्वच्छ, शुभ्र, सूर्यासारखे प्रकाशमान करा. आपण ज्ञानाने इतके परिपुर्ण बना की, सर्व सांप्रदाय हे आपल्याकडे ओढले जातील.
दुसऱ्यांचे अज्ञान पाहाण्यापेक्षा आपण ज्ञानी होण्याचा प्रयत्न करावा. आपण आपले दोष क्षीण करत जावे, दुसऱ्यांच्या सद्गुणांकडेच लक्ष ठेवावे. गुरुंच्या वचनांवर विश्वास ठेऊन वाटचाल चालु करावी. कोणाच्या निंदेने भडकुन जाऊ नये. ज्याठिकाणी आपल्या गुरुंचा अपमान होत असेल तर, आपण प्रतिकार जरुर करावा पण तो हिंसक नसावा. किंवा, ती जागा बदलावी. असो, आपण गुरुंच्या मार्गावरच वाटचाल चालु ठेवावी.
गुरुंचा मारग भला। त्यांच्या पाठी जाऊ चला।।
गुरुंचा आशीर्वाद घेऊ। त्यांचे नाम मुखी घेऊ।।
सारे परब्रह्म होऊ। कर्मी अकर्मता राहू।।
दत्ता म्हणे सोडा गाठी। गुरुपायी घाला मिठी।।
साधकाने प्रत्येक काम मनापासुन करावे. दुबळे बनु नये. मनाने कणखर बनावे. कोणाचा अन्याय सहन करु नये. स्वधर्मावर वाटचाल करावी. प्रत्येक कर्म हे विश्वासाने केल्यास ती गुरुसेवा होते व अशाच सेवेने गुरु संतुष्ट होतात. जर आपण कामात भ्रष्टाचार, खोटेपणा किंवा, स्वैराचार केला तर त्यायोगे सद्गुरु हे दुःखी, कष्टी होतील यात शंकाच नाही. म्हणुनच आपले आचार व विचार शुद्ध ठेवावेत

                               ............डी सिताराम






















अनुग्रह कसा होतो? - एक वैज्ञानिक सत्य

अनुग्रह कसा होतो?
मनाची अनुग्रह घेण्याची तयारी झाली व सद्गुरु भेटला तर असा भाग्यवान साधक सद्गुरुंना मनोभावे शरण जाऊन अनुग्रह देण्याविषयी विनवतो. गुरुंना पण असा आर्ततेचा व जिज्ञासु वृत्तीचा शिष्य पाहुन आनंद होतो व ते मोठ्या प्रेमाने शिष्यास नामरुपी अनुग्रह देतात. नाम हे निर्गुण परमात्म्याचे असल्यामुळे ते चैतन्यरुप व ब्रह्मरुप असे असते. नाम हे कधीच स्थुल, अचेतन व अंधकारमय तमोगुणी असे नसते. नाम हे शुद्धसत्वमय असे असल्यामुळे नामधारक हा शुद्धसत्वमय बनुन जातो. ज्याचे ज्याप्रकारचे चिंतन असते, त्यास त्याप्रकारचा अनुभव येतो. हा निसर्गाचा नियमच आहे. म्हणुनच म्हणतात की,
।।जसे ज्याचे चिंतन। तसे त्याचे होते मन।।
त्यामुळे निर्गुण परमात्म्याचे नाम घेतांना मन हे परब्रह्माशी तादात्म पावते. यासाठी दररोज क्रियायुक्त नाम घेण्याची साधकाची तयारी पाहीजे. काहीजण थोडे दिवस नाम घेतात, नंतर मात्र महिनों महिने नामच घेत नाहीत. नंतर असे साधक नाम घेऊन काहीच फायदा झाला नाही असे रडगाणे गात बसतात. काहीजण अनुग्रह घेतल्यावर तात्काळ ईश्वरदर्शन वा आत्मसाक्षात्कार होतो अशी गोड (गैर) समजुत करुन घेतात. तसा अनुभव न आल्यामुळे नाम जपणे सोडुन देतात. क्रियायुक्त नाम न घेतल्याने ते (अभागी) साधक दिव्य अनुभवाला पारखे होतात. त्यामुळे गुरुंनी सांगितल्याप्रमाणे नाम घेतल्याने साधकास दिव्य अनुभव येऊ लागतात. नाम हे आपोआपच चालु होणे हे नाम समजल्याचे लक्षण आहे. असो.
अनुग्रहाच्या वेळी सद्गुरु शिष्याच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवतात व त्यास नाम सांगतात. शिष्य नाम घेत असतांना गुरु त्यास एकप्रकारची गती देतात. नाम घेण्याची क्रिया समजाऊन सांगतात. शिष्याचा दृढनिश्चय, वैराग्य व ज्ञानपिपासा पाहुन सद्गुरु शक्तिपाताच्या क्रियेने दिक्षा देतात. त्यायोगे शिष्याच्या शरिरांतर्गत बदल होऊ लागतात. त्याच्या शरीरातील मानसिक घडामोडी तीव्र वेगाने किंबहुना प्रकाशाच्या वेगेपेक्षाही दुप्पट वेगाने घडु लागतात. सारे शरीर कंपायमान होते. दृष्टी कधी अर्धोन्मिलित तर कधी बंद असते. सद्गुरु नामजपास आणखी गती देतात. शिष्याचा श्वासोश्वास हा जलद गतीने पडु लागतो (भस्रिका प्राणायमाच्या वेळी जसा श्वासोश्वास होतो तसा). शरीर कधी उजवीकडे, डावीकडे तर कधी मागेपुढे जलद गतीने हलु लागते. जप हा मध्यमेतुन सुरु झाल्याने शिष्यास आणखी काही करावे लागत नाही. विशिष्ठ प्रकारची तंद्रावस्था अनुभवास येते. जड समाधिचा नकळत लाभ होतो. अंतर्मन जाग्रुतीचा बाह्य मनास स्पर्श झाल्यामुळे एक दिव्य आनंदाची नशा जडते व या नशेत साधक आनंदाने रडू लागतो. त्यास ही अवस्था बिलकुल आवरता येत नाही. त्याला कशाचीही शुद्ध रहात नाही. त्याचे डोळे अश्रुंनी डबडबलेले असतात. अष्टसात्विक भाव जागृत झाल्यामुळे तो निश्चेष्ठ पडतो. किंवा, जोरजोराने हुंदके देऊन रडू लागतो. शिष्य ज्या गुणाचा तशी अवस्था अनुग्रहाच्या वेळी प्रगट होते. रडतांना शिष्य घुटके गिळु लागतो. शरीराच्या अंतर्बाह्य एक प्रकारची सुखद संवेदना जाणवु लागते.
।। आपणा सारखे करीती तात्काळ। नाही काळवेळ तयालागी।।
असा सद्गुरुंचा महिमाच आहे. आणि हे खरेच आहे. अशा प्रकारचा अनुग्रह झाल्यामुळे कित्येक साधक आजही दिव्य आनंदाचा लाभ घेत आहेत व आजही ब्रह्मभावात आहेत.
क्रियायुक्त नाम कसे घ्यावे हे समजल्यामुळे साधक दररोज त्यापद्धतीने नाम जपतो. त्यायोगे मन प्रसन्न होऊ लागते. मानसिक ताणतणाव कमी होत जाऊन साधक मोठ्या प्रसन्नतेने व्यवहार करु लागतो. त्याच्या देहातील जडतत्वे कमी होत जाऊन साधक उच्चतर प्रांतात प्रवेश करतो. त्यास दैवी अनुभव येऊ लागतो. शरीर हलके हलके होते. शरीरांतर्गत जागृत असलेली शक्ती ही सुषुम्ना नाडीच्या तोंडाला धक्के मारु लागते. किंबहुना  सुषुन्मा  नाडीत त्या  शक्तीचा संचारही  होऊ लागतो. त्यामुळे
शिष्याच्या चेहऱ्यावर सात्विकतेचा प्रकाश चमकु लागतो. यानंतर साधकाने काही पथ्ये जरुर पाळावीत.
साधकाने पाळायची काही पथ्ये
8ब्रम्हचर्याचे पालन करावे.
8प्रत्येक स्रीच्या ठायी मातृभाव असावा.
8खोटे बोलु नये.
8चौर्यकर्म किंवा व्यभिचार करु नये.
8सर्वांशी नम्रपणे वागावे.
8गुरुंच्या भेटीसाठी नियमित जावे व त्यांच्याकडु नामजपाची गती वाढवुन घ्यावी. चुकलेल्या क्रिया पुन्हा समजाऊन घेतल्यास तो शिष्य पाहता पाहता आत्मस्वरुपाचा अधिकारी बनु शकतो.
8सत्संग व शत्शास्र यांचा सहवास करावा.
8ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, भागवत, गीता तसेच चांगदेव पासष्टी व   उपनिषदे समजुन घ्यावीत.
8मन हे जास्तीत जास्त अंतर्मुख करावे.
8दुसऱ्यांचे दोष न पाहता आपल्यातील दोष कमी करीत जावे.
8एकादशीला नियमित उपवास करावा.
8नियमबद्ध काम करावे. आजचे काम उद्यावर टाकु नये.
8स्वधर्मावर वाटचाल करावी.
8अश्लिल व बिभित्स वाचणे कटाक्षाने टाळावे.
मित्रांनो, अनुग्रह घेतांना जी अवस्था होती ती दिवसेंदिवस वाढु लागते. शिष्यांचे लक्ष संसारातील घडामोडींवर रहात नाही. (याचा अर्थ असा की, तो संसार करतो पण विरक्त मनाने. सुख-दुःख मनास स्पर्शु देत नाही.) त्याचे डोळे नुसत्या भगवत् स्मरणानेच ओले होतात. गुरुंच्या भेटीसाठी तो व्याकुळ होतो. गुरुंच्या आठवणीने त्यास रडु येते. साधकांच्या संपर्कात जास्त काळ घालवतो. अशी अवस्था जास्त काळ राहु लागली तर गुरु त्याची पारख करतात. त्याच्यात वास करीत असलेले दैवी गुण जागृत होत आहेत की नाही,त्याची चाचपणी करतात. तसेच त्याचे दोष क्षीण झाले आहेत की नाही त्याचीही ते परिक्षा घेतात. नंतर मात्र शिष्य या परिक्षेला उतरला तर वेळ येते ती प्रबोधनाची. प्रबोध घेणे म्हणजे महावाक्याचा स्विकार करण्याची आलेली योग्य वेळ होय. ही सर्वश्रेष्ठ परिपुर्ण प्रक्रिया आहे. जे सद्गुरु शिष्यांना अनुग्रह देतात तेच त्यास प्रबोध देतात. शिष्याची अवस्था अंतर्मुख करतात. हा महावाक्याचा बोध प्राप्त झाल्यावर अध्यात्मिक शक्ति जागृत करुन ती उफराटी करतात. योग्य वेळ आल्यावर असे भाग्यवान शिष्य आपली शक्ति बहिर्मुख करुन ती लोककल्याणाकडे वळवतात. बहुजन हिताय, बहुजन सुखाय अशी त्यांची वृत्ती होते. नाथा घरची उलटी खूण ज्यास समजली तोच खऱ्या अर्थाने साधू बनतो. आणि ही खूण प्रबोध झाल्यावर जास्त समजते. म्हणुनच अनुग्रह घेतल्यावर प्रबोध अवश्य घ्यावा. काही सांप्रदायिक गुरु प्रथम अनुग्रहरुपी नाम देण्याएवजी प्रबोध देऊन महावाक्याचा उपदेश करतात. पण तसे करणे योग्य नाही. कारण बीज पेरण्यापुर्वी उत्तम मशागत केली  पाहीजे, तरच बीज पेरुन फायदा होतो. अन्यथा बीजांकुर होण्यापुर्वीच बीज करपुन जाते. तसलाच हा प्रकार समजावा. याठिकाणी अनुग्रह घेणे म्हणजे मनावर संस्कार करणे व मन हे भक्तिने, नामस्मरणाने नांगरुन तयार ठेवणे होय. एकदा का मन तयार झाले तर मग प्रबोधरुपी बीज पेरावयास हरकत नाही. असो.
दहावीची परिक्षा चांगल्या मार्कांनी पास झालो तर उच्च शिक्षणासाठी प्रवेश निश्चित होतो. जर आपण आयुष्यभर दहावीचाच अभ्यास केला तर प्रगती ही काहीही होणार नाही. त्याचप्रमाणे अनुग्रह घेतल्यानंतरची श्रेष्ठ वेळ येते ती प्रबोधनाची. हे लक्षात ठेवावे. जसा अनुग्रह बळजबरीने घेता येत नाही, त्याचप्रमाणे काहीही अनुभव न येता प्रबोध घेण्यासाठी उतावीळ होऊ नये. सद्गुरुंच्या संपर्कात राहीलो तर हा अनुभव लवकर येतो. निरंजन कवींनी सद्गुरुस्तवनामध्ये म्हटलेलेच आहे की,
प्रबोध करीता श्रम फार झाला। विसरु कसा मी गुरुपादुकाला।।
प्रबोध  मिळाल्यावर शिष्य  खऱ्या  अर्थाने  जीवनमुक्तिच्या क्षेत्रात प्रवेश करतो व तो हळुहळु विश्वस्वप्नातुन जागा होऊ लागतो. साधकाचे डोळे ज्ञानाने चमकु लागतात. मनातील विषयवासना कमी होत गेल्यामुळे साधकास खुपच दिव्य अनुभव येऊ लागतात. कोणाला दिव्य दर्शन, दिव्य स्वप्न स्वप्ने पडु लागतात. कोणाला देवादिकांचे दर्शन होते. कोणाला क्षुद्र सिद्धिंचा लाभ होतो. पण खऱ्या साधकाने स्वतःस वरील चमत्कारांत अडकवुन घेऊ नये.
अनुग्रह देण्यापुर्वी सद्गुरु शिष्यास काही सर्वमान्य अटी सांगतात, त्या अशा...
8दर एकादशीला उपवास करावाः- महिन्यातुन येणाऱ्या दोन्ही एकादशीस उपवास करावा. यामागे शास्रिय दृष्टीकोन आहे. उपवास याचा अर्थ निरंतर मनाने ईश्वराजवळ रहाणे व ईश्वर चिंतन करणे. उपवासामुळे मन सुक्ष्म होते. या दिवशी काहीही न खाता केवळ पाणी पिऊन लंघन करावे. कोणाला असे लंघन करणे शक्य नसल्यास फळांचा रस घ्यावा, लिंबु पाणी घ्यावे. या दिवशी पोटास पुर्णपणे विश्रान्ति द्यावी. त्यामुळे पोटातील स्नायु कार्यक्षम होतात व चेहरा तेजस्वी होतो.
8धार्मिक ग्रंथाचे वाचनः- ज्ञानेश्वरी, भागवत, योगवासिष्ठ यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे, मनन करावे, चिंतन करावे. असे आत्मोन्नतीपर ग्रंथ वाचल्याने अध्यात्मिक विचारांची बैठक पक्की होऊ लागते. सद्गुरुंचा बोध मनात पक्का होऊ लागतो. विचारात प्रौढत्व येते. सात्विक मन झाल्यामुळे आपले आचरण शुद्ध होते. हातुन वाईट कृत्ये होत नाहीत. मन व बुद्धि प्रगल्भ होते. ईश्वराची भक्ति दृढ होऊ लागते. त्यामुळे न कंटाळता दररोज ग्रंथांचे वाचन करावे.
8तुळसीला पाणी घालावेः- तुळशी ही पवित्र वनस्पती आहे. तिच्यामुळे घरदार पवित्र होते. जंतूंचा नायनाट होतो व प्राणशक्तीचा उदय होतो. त्यामुळे आपल्यालाही मुबलक प्रमाणात प्राणवायू मिळतो. तुळशी ही विष्णुला प्रिय आहे. त्यामुळे तुळशीत ईश्वराचे रुप पाहिल्याने सर्वाभुति ईश्वर आहे हा बोध दृढ होतो. म्हणुनच तुळशीला पाणी घालावे व तुळशीची पूजा करुन प्रदक्षिणा घालावी.

8दररोज नाम घ्यावेः- नामस्मरण तर नियमित करावेच, पण क्रियायुक्त नाम घ्यावेच. आपल्या मेंदुत जन्मोजन्मीच्या ज्या दुषित लहरी असतात त्या लहरी बाहेर पडुन वातावरण दुषित करण्याचे काम करतात. दररोज नाम घेत गेल्याने अशा दुषित लहरी नाहिशा होतात व अत्यंत पवित्र आणि सात्विक लहरी निर्माण होऊन भोवतालचे वातावरण पवित्र करतात. दररोज नाम घेत गेल्याने आपल्या बुद्धिवरील अनंत जन्माचे संस्कार नाहिसे होत जातात व आपण दिवसेंदिवस आत्मज्ञानाच्या समिप जाऊ शकतो. दृष्टी व वाणी पवित्र ठेवावीः- दुःखद वा कामोत्तेजक दृश्य पाहिल्याने मन चंचल व अस्थिर होते. दुसऱ्यांचे दोष पाहिल्याने वा विनाकारण भांडल्याने मन बेचैन होते. यामुळे साधना करतांना अडथळे येतात. मनाचे अधःपतन होते. यासाठी दृष्टी व वाणी पवित्र ठेवणे हितावह आहे.
8दररोज हरिपाठ म्हणावाः- भगवान ज्ञानेश्वरांच्या हरिपाठात हरिनामाचा महिमा गाईला आहे. नामावर चित्त हळुहळु जडु लागले की, मन हे नाममय होऊ लागते. एकदा का दैवी नामात मन तल्लिन झाले की, शरीर नादमय  होऊ लागते. कुंडलिनि शक्ति जागृत होऊ लागते. सद्गुरुंनी दिलेले नाम व ईश्वराचे सगुण रुपातील नाम यात कसलाही भेद न उरल्याने, साधकाने कोठलेही नाम जपले तरी त्यास एकच दैवी अनुभव येऊ लागतो. यासाठी हरिपाठ हा समजुन म्हणावा.

                                                                                          ..........डी सिताराम