सोमवार, २५ एप्रिल, २०११

दत्ता म्हणे

गुरु चरणांची शोभा। भोळा राजा असे उभा।।
याशी नाही मानपान। दिले नामाचे साधन।।
नामरुप ऐक्य करी। भवव्याधी दूर सारी।।
दत्ता म्हणे माझा भाव। गुरु जाहला स्वभाव।।



 

संत समागमु धरावी आवडी।
जाशी पैलथडी भवसिंधू।।
संतांचे वचन अंतरी लक्षुनी।
आपुल्या जीवनी मुक्त होशी।।
संत हेची बाप संत हेची माय।
भक्तालागी सोय सर्वकाळी।।
संत उपदेश हाची गीता सार।
कैवल्याचा भार दत्ता म्हणे।।
 ..........डी सिताराम



रविवार, २४ एप्रिल, २०११

सद्गुरुंची पूजा कशी करावी?

पुर्वी लहानपणीच मुलांना गुरुंच्या आश्रमात शिक्षणासाठी टाकले जायचे. तेथे त्याला सर्व प्रकारची शिक्षा मिळे. प्रत्यक्ष गुरुंच्या सान्निध्यात राहुन, शिष्य गुरु इतकाच, किंवा गुरुपेक्षाही वरचढ निघायचा. अशा भाग्यवान शिष्यांना प्रत्यक्ष गुरुंची सेवा करायला मिळायची. पण हल्लीच्या धावपळीच्या काळात प्रत्यक्ष गुरुंचा सहवास फारच कमी लाभतो. आपल्याला गुरुंच्या घरी रहाणे शक्य होत नाही. त्यामुळे गुरुंची सेवा कशी करावी? असा प्रश्न पुढे उभा रहातो. त्यामुळे गुरुंची खरी सेवा किंवा पूजा म्हणजे काय ते समजुन घेऊ.सद्गुरुंनी स्वधर्माचे व आत्मविकासाचे जे ज्ञान आपणास दिले आहे, त्या ज्ञानाची कास धरुन स्वधर्मावर चालणे व त्यांनी दिलेले नाम अखंड घेत जाणे म्हणजेच गुरुसेवा होय. प्राणीमात्रांवर प्रेम करणे, दयाबुद्धिने व समानतेने वागणे म्हणजेच गुरुसेवा होय. कठोर शब्दांनी दुसऱ्यांचे मन दुखावणे, अपमान करणे, शत्रुत्व करणे, व्देषबुद्धी वा आकस ठेवणे, परस्री विषयक आसक्ति ठेवणे, परधनाचा अपहार करणे इ. अधर्मकारक व अनीतिकारक गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. वरील प्रकारची अनीतिकारक गोष्टी न करणे हीच खऱ्या अर्थाने गुरुसेवा होईल. काहीजण प्रत्यक्ष गुरुंशी उलटे बोलतात. त्यांच्यासमोर धडधडीत खोटे बोलतात व उगाच आत्मप्रौढी मिरवतात. हे कितपत योग्य आहे? व ही गुरुसेवा खऱ्या अर्थाने होऊ शकेल काय याचा सर्वांनी विचार करावा.
सद्गुरुंचा देह जरी स्थुल रुपाने दिसत असला तरी तो अतिवाहक किंवा ज्ञानमय असा असतो. त्यांच्यातील गुरुत्व हे साऱ्या विश्वात कोंदाटले आहे. त्यामुळे साऱ्या प्राणीमात्रांशी प्रेमळपणाने वागलो तर, सद्गुरुंशीच प्रेमळपणाने वागण्याचे समाधान पदरी पडेल. व तीच गुरु सेवा होईल. जे कोणी  रंजलेले वा  गांजलेले असतील  जे कोणी दुःखाने पीडित असतील त्यांची जमेल तितकी सेवा केल्यास प्रत्यक्ष सद्गुरुंचीच सेवा घडेल. कोणाचही द्वेष वा मत्सर न करता नम्रपणे वागावे, मित्रत्वाने वागावे व गुरुंनी सांगितलेल्या परमार्थ मार्गावर वाटचाल चालु ठेवावी. आपले मन हे शात ठेवावे. हिच खरी गुरुसेवा होय. अशा सेवेने सद्गुरु संतुष्ट होतात.
करा नामाचे साधन। तीच गुरुसेवा जाण।।
नाम सुलभ सोपेरे। नामे काळ थरथरे।।
करा बापांनो उच्चार। तयाविण ना उद्धार।।
दत्ता म्हणे झालो धीट। मार्ग पाहिला चोखट

     ......... डी सिताराम









सद्गुरु कसा पहावा?

सद्गुरुंना देहात पाहु नये. माझे गुरु चराचरात वास करत असुन मला ज्ञान देत आहेत, असा भाव ठेवावा. सतत ज्ञान मिळवत रहावे. हिच गुरुंची गुरुदक्षिणा होय. जसे आकाश सर्व प्राणीमात्रांना एकच एक असते, तसे सद्गुरु सर्व प्राणीमात्रांना एकच एक असतात. हे सदैव लक्षात ठेवावे. सदुरुंना देहात पाहणे म्हणजे आपली ज्ञानदृष्टी संकुचित करुन घेणे होय. म्हणुनच सद्गुरुंना विश्वरुपात पहावे. त्यांनी दिलेल्या नामसाधनेची सुलभपणे वाटचाल करावी व नाम मोठ्या विश्वासाने जपावे.

                        नाम सोपे नाम सोपे। सरतील विघ्ने पापे।।
                        नाही आणिक साधन। देव पाहायाशी जाण।।
                        हरिप्राप्तीचे लक्षण। पांडुरंग नाम जाण।।
                        दत्ता म्हणे घेई नाम। पुढे उभा घनःश्याम।।





शनिवार, १६ एप्रिल, २०११

गुरु असे असतात

आकाश हे ज्याप्रमाणे सर्वजीवांना एकच एक असते, तसेच सद्गुरु सर्व जीवांना एकच एक असतात. त्यांचा सांप्रदाय भिन्न असो, त्यांची साधना भिन्न असो, पण त्यांची ज्ञानाची पातळी एकचअसते. जीवन्मुक्तावस्था ही साऱ्यांत एकच असते. त्यांना एकाच प्रकारचे आत्मदर्शनघडत असते. त्यांची ब्रह्मदृष्टी एकच असते. आपण मात्र त्यांच्यात अज्ञानाने भेदभावकरतो. माझा गुरु एक व तुमचा गुरु दुसरा असा भेद करुन आपण मात्र आत्मस्वरुपावरुन घसरतो.

गुरु बद्दलची विश्वव्यापक दृष्टी

मित्रांनो आपण सद्गुरुंना ठराविक चौकटीत डांबुन ठेवतो. त्यांना देहधारी मानुन त्यांचे श्रेष्ठपण त्यातच समजण्यात आपण चुक करतो. जे भाग्यवान गुरुपदाला पोचलेले असतात त्यांचा आत्मा हा विराडात्मा, विश्वात्मा बनलेला असतो. आपल्या डोळ्यांना त्यांचा देह  जरी दिसत असला तरी ते अतिवाहक देहानेच अमर असतात. त्यांचा चराचरात वास असतो. अशा विश्वव्यापक सद्गुरुंना नमस्कार विश्वव्यापकत्वच करावा.

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे।
त्या त्या ठिकाणी निजरुप तुझे।
मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी।
सद्गुरु तुझे पाय दोन्ही।।    
हे सद्गुरो! माझे मन ज्या ज्या ठिकाणी जाईल, ( मनात जे जे विचार येतील, माझी दृष्टी जिकडे जाईल, किंवा जे जे दृश्य डोळ्यांनी पाहील) त्या साऱ्या ठिकाणी तुमचेच निजरुप आहे. व माझे मस्तक मी ज्या ज्या ठिकाणी ठेवील त्या त्या ठिकाणी तुमचेच पवित्र चरण असतील.
       
         ....डी सिताराम





गुरुवार, १४ एप्रिल, २०११

दत्ता म्हणे

कधी भेटशी रे सख्या पांडुरंगा।
अपराध सांगा काय झाला।।
मोह माया पाश सारियेले दुरी।
नको बा श्रीहरि दुर जाऊ।।
ओढ दर्शनाची लागली मनाशी।
येऊनी वेगेशी भेट देई।।
दत्ता म्हणे जीव झाला कासाविस।
झालो बा उदास जनीवनी।।
    ......डी सिताराम

स्वगत- एक चिंतन

मी पातोंड्याचा, आम्ही दोघं भाऊ व एक लहान बहिण, भाऊ मोठा, मी दुसरा व बहिण माझ्या पाठची.
वडिल घरच्याघरी टेलर काम करीत. आई दुसऱ्यांच्या शेतावर जाऊन मोलमजुरी करत असे.
लहानपणी आमची गरीबीची परिस्थिती होती. अत्यंत हालाखीत बालपण गेले. वडिलांनी आम्हाला वाचनाची गोडी लावली. आम्ही खड्या आवाजात कविता व पाढे म्हणत असु. आई विठ्ठलाची भक्ति करत असे. विठ्ठल मंदिरात जाऊन मी विठ्ठलास नमस्कार करत असे. व विठ्ठलास प्रदक्षिणा मारत असे. त्या बालवयात माझे व विठ्ठलाचे काहीतरी नाते आहे, असे मला सतत वाटत असे. विठ्ठलाची मुर्ति मी डोळे भरुन पाहत असे. त्यावेळी मला काळ वेळाचे भान राहत नसे. हा कालखंड माझ्या विठ्ठलाच्या अनिवार ओढीचा होता. मंदीरात जेव्हा हरिपाठ होत असे त्यावेळी माझे भान हरपुन जात असे. टाळ मृदुंगाचा ध्वनी मला बेहोष करत असे व मी तहानभुक विसरुन जात असे. मोठेपणी मला कळाले की, मी लहानपणीच नाद समाधीचा अनुभव घेतला होता.
मी लहान असतांनाची गोष्ट, माझ्या मित्राचा नवस फेडण्यासाठी आम्ही पातोंड्याहुन बैलगाडीने चाळीसगांव जवळील पाटणादेवीस निघालो होतो. पाच सहा बैलगाड्या होत्या. मी माझ्या आई सोबत होतो. रात्रीची वेळ होती. आकाशात पुर्णचंद्र होता. खुपच छान वातावरण होते. सगळीकडे पिठुर चांदणे पडले होते. आकाशात चांदण्या चमकत होत्या. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज वातावरण प्रसन्न करत होता. मी दिग्मुढ होऊन तो देखावा पाहत होतो. मीच सगळीकडे आहे असे वाटु लागले होते. सारे वातावरण मीच बनलो आहे, असा अनुभव मी घेत होतो. आकाशातील चंद्र तारे व आसमंतात पसरलेला नाद सारे काही मीच बनलो होतो. हळुहळु माझी जाणिव हरपत होती व मन दिव्य आनंदाचा वेध घऊ लागले होते. माझ्या सकल संज्ञा हरपल्या व मी निचेष्ट पडलो. कितीतरी वेळ मी त्या तंद्रित होतो कोणास ठाऊक पण ज्यावेळी मी डोळे उघडले, त्यावेळी आम्ही पाटण्याच्या डोंगराजवळ आलो होतो.  चंद्र पश्चिमेला कलला होता. हा माझा पहिला साक्षात्कार असावा. कारण या घटनेनंतर मी बऱ्याचदा नकळत या आनंदात रमुन जात असे. त्यावेळी मला काळ वेळाचे भान रहात नसे. एखादी गोष्ट हातुन होण्यास विलंब लागत असे.
आम्ही भावंडं जेव्हा कंदिलाच्या उजेडात अभ्यास करत असु त्यावेळी तो धुर ओकणारा कंदिल, माझा भाऊ व
आमच्यावर पहारा करत असलेले माझे पिताश्री व मी हे जणू काही एकाच वस्तुचे बनले आहोत आणि ती वस्तु माझ्या ह्रदयात वसली आहे असे मला सारखे वाटे व मन त्या एकात्ममतेचा अनुभव घेण्यास रमुन जात असे. अशावेळी माझे अभ्यासात लक्ष नाही म्हणुन मी वडिलांच्या हातचा मार देखील भरपुर वेळेस खाल्ला आहे.
लहानपणीच माझ्या हातुन काही साधना झाल्या, पांडुरंगाची भक्ति घडली. खुप दिव्य अनुभव आलेत.
माझे पहिले अध्यात्मिक गुरु पाटणादेवीचे थोर भक्त स्वामी प्रणवानंद हे होत. त्यांच्या प्रसादाने खुप दिव्य अनुभव आले. त्यानंतर कॉलेजचे शिक्षण पुर्ण केल्यावर मी कोकणात गेलो. तेथे वर्षभर शिक्षकाची नोकरी करुन मी नागोठण्याला आय पी सि एल कंपनीत कामाला लागलो. या मधल्या कालखंडात मनातील विकारांशी झगडत मी योगवासिष्ठ या दिव्य ग्रंथाचे वाचन करत होतो. त्या ग्रंथातील अपौरुषीय तत्वज्ञानाने मी धुंद होत असे. हा ग्रंथ समजण्यास खुपच अवघड आहे. त्यामुळे तो फारसा लोकप्रिय नाही. खुप जणांना या विषयी माहितीही नसेल. पण या ग्रंथाचा  माझ्या मनावर खुप खोलवर प्रभाव पडला आहे.
मी 1994 साली सद्गुरुंचा अनुग्रह घेतला. माझे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद महाराज (घोटीकर) हे होत. त्यांच्या
अनुग्रह बलाने माझी अध्यात्मात चांगली प्रगती झाली. त्रिपुटींचा हळुहळु क्षय व्हायला लागला होता. जगताविषयी फारशी आसक्ती राहीली नव्हती. माझा तो काळ विश्वस्वप्नातुन जागे होण्याचा होता. पण काही कर्म बीजे शिल्लक राहील्याकारणामुळे मी संसारात रमलो होतो. उदासिन वृत्ती एकीकडे तसेच संसाराची ओढ एकाकडे. त्यामुळे मी सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली नामस्मरणाचा मारा चालु ठेवला. प्रगती होत होती. हातातुन काही लिखाण झाले. काही काव्य निर्मिती झाली. याच सुमारास मला गायत्रीदेवीचा साक्षात्कार झाला. तो कालावधी माझ्या अध्यात्मदृष्टीने खुपच चांगला गेला. मी काही जीवन्मुक्त नाही पण जीवन्मुक्तीचा अनुभव घेतला आहे. अध्यात्माबरोबर माझा संसार देखील चांगला चालु होता. दोन मुले झाली. मोठा मुलगा अमोल व छोटी कन्या अमृता. आता दोघेही भावी कलाकार आहेत. पण त्यांना कलाकार म्हणुन घडवण्यासाठी आम्हा उभयतांची खुपच धावपळ झाली. त्या कालखंडात पाच वर्ष आमचा संसार थाऱ्यावर नव्हता. कारण मुलांची आवड जोपासण्यासाठी गुरुंचा शोध घेणे क्रमप्राप्त होते. माझ्या या वेडेपणाला माझे मित्र हसत होते. पण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन माझे काम मी करत होतो. शेवटी कुटुंब हे कधी पेण कधी नागोठणे(रायगड) असे स्थलांतर करीत शेवटी पुण्याला स्थिरावले. मुलांनी कलाक्षेत्रात चांगली प्रगती केली. अमोल हा तबला स्पर्धेत देशपातळीवर तीन वेळा प्रथम क्रमांकाने आला. अमृताने तर व्हॉयलिन सारख्या अवघड वाद्यावर प्रभुत्व मिळवले, ती बासरीपण छान वाजवते. तसेच ती हार्मोनियम हे वाद्य मोठ्या तयारीने वाजवते. तिला
पं. अप्पासाहेब जळगावकरांचा आशीर्वाद व मार्गदर्शन मिळाले आहे. अमोल हा पुण्याला पं. सुरेश सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिकतो आहे. सध्या तो ललित कला केंद्र पुणे येथे म्युझिक करतो आहे. त्याला त्याच्या गुरुंनी छोटा पंडित ही पदवी प्रेमाने बहाल केली आहे. कॉलेजमधील सगळेजण त्याच्या तबला वादनावर खुश आहेत.
या परिस्थितीत येण्यासाठी खुपच संकटांना तोंड द्यावे लागले. काही मित्रांनी मला चांगले म्हटले तर काहींनी माझा उपहास केला. पण या साऱ्या संकटांना मी केवळ अध्यात्मामुळेच तोंड दिले. न में भक्त प्रणश्यति।। ( माझा भक्त कधीही नाश पावत नाही ) भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी माझा व माझ्या परिवाराचा सांभाळ केला. मला प्रत्येक संकटातुन त्यानेच वाचवले. माझा पाय सन्मार्गावरुन कधीच ढळु दिला नाही. पांडुरंगाचा कृपा आशीर्वाद माझ्या व माझ्या कुटुंबाच्या पाठीशी आहे, असे मला सतत वाटत रहाते. आता तर पांडुरंगच माझा श्वास व प्रश्वास बनला आहे. मी मोठा भक्त आहे असेही नाही. तशी माझी योग्यताही नाही. पण माझा भोळा भाव मी पांडुरंगाच्या चरणी अर्पण केला आहे. तो ठेवील तसा मी रहाणार आहे. पण येवढे मात्र नक्की की,...........
जेथे जातो तेथे तु माझा सांगाती।
चालविसी हाती धरुनिया।।
या संतोक्तिनुसार मला अनुभव येत आहे.पांडुरंगाने माझा सर्वतोपरी सांभाळ केला व या पुढेही तो करीत राहील.
जय हरि.

मंगळवार, १२ एप्रिल, २०११

दत्ता म्हणे

नाम घ्यावे विठोबाचे।
गुण वाचे वर्णावे।।
तेणे झडे भवरोग।
नाही भोग संसारी।।
मनी शुद्ध भाव होई।
बाधा जाई सकल।।
दत्ता सांगे सकलाशी।।
तयापाशी नारायण।।

नाम घ्यावे सर्वकाळ।
तळमळ भावेशी।।
तेणे झडेल हा मळ।
करी निर्मळ मनाशी।।
दत्ता सांगे हाकारोनी।
करा पेरणी नामाची।।

नाम फुकाचे फुकाचे।
होई साचे अमृत।।
करा झणी उठाठेव।
काळ भेव दाववी।।
गर्जुनिया वदे वाचे।
संसाराचे बिज क्षय।।
दत्ता रंगला नामात।
केली मात कळीकाळा।।

नाम गोड तुझे देवा।
पडे हेवा ब्रह्मादिका।।
धन्य संसाराशी आलो।
रंगी रंगलो नामात।।
जन्मोजन्मी दास तुझे।
नाही ओझे संसाराचे।।
दत्ता म्हणे धन्य धन्य।
झालो अनन्य दास तुझे।।

नाम सुंदर बरवे।
मनी घ्यावे आवडिने।।
तेणे तुटती बंधन।
आत्मज्ञान प्रगटेल।।
दत्ता ध्याई विठ्ठलाशी।
ओंकाराशी पडे गाठ।।

नाम साधन सोपेरे।
घ्यारे घ्यारे सकळ।।
ध्याई आदरे गोविंद।
मनी छंद लागलासे।।
नसे आणिक साधन।
वाही आण विठोबाची।।
दत्ता झाला नारायण।
त्रिभुवनी व्यापलासे।।

गुज सांगावे देवाशी।
तयापाशी लडिवाळ।।
रक्षिल हा सर्वभावे।
त्वरे लागावे चरणी।।
होई संसाराचा नाश।
सावकाश स्मरुनिया।।
दत्ता म्हणे सखा हरी।
पार करी हा संसार।।

.............डी सिताराम




रविवार, १० एप्रिल, २०११

स्वगत- एक साक्षात्कार

गुरुंच्या आदेशानुसार मी मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. अंगात चैतन्य संचारले होते. जबरदस्त आत्मविश्वास सोबत होता.मुक्कामाचे ठिकाण खुपच लांबवर होते. पण कशाचीही तमा न बाळगता मला त्या ठिकाणी पोचायचेच होते.
त्या रस्त्यावरुन चालणारे बरेच जण होते. कोणी सावकाश गतीने चालत होता. कोणी रखडत रखडत चालत होता. कित्येक जण झाडाच्या सावली  खाली विसावा घेत बसले होते. त्यापैकी अनेक जण निराश झालेले होते. कित्येक जण मागे परतत होते. मोठा विलक्षण देखावा होता तो. त्याकडे दुर्लक्ष करुन मी एकसमान वेगाने चालु लागलो. न थांबता, न थकता.
सूर्य मध्यान्नी आला होता. उन रणरणत होते. आजुबाजुला चौकाचौकांवर शितपेये,  पाणपोईंची, मेवामिठाईंची दुकाने होती. माझ्याबरोबरीचे कित्येक जण त्या जत्रेत रमले होते. कोणी शितपेये तर कोणी पाणी पित होते. तर कोणी मस्तपैकी पक्वांन्नावर ताव मारत होते. त्यापैकी काहीजणांनी मला थांबण्यास सांगितले. जाशील सावकाश म्हणुन सांगितले. मी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. ध्येय गाठल्याशिवाय मोहनगरीत अडकायचे नाही हे मी मनाशी ठरवले होते.  मला माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचायचेच होते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करुन मी पुढे चालु लागलो. चालता चालता कसले तरी गाणे गुणगुणत होतो. आकाशात थोडेफार ढगं जमली होती. सूर्यदेव कधी कधी झाकोळला जात असे. त्यावेळी हवेची थंडगार झुळुक येवुन मनाला आनंद देत असे. किती विलक्षण दृश्य होते ते.
चालता चालता सायंकाळ झाली. सूर्य उतरंडीला लागला. घराबाहेर पडलेले श्रमिकवर्ग घराकडे परतत होते. वासरांच्या आठवणींनी गाई हंबरत परतत होत्या. त्यापाठोपाठ गुराखी देखील लगबगीने परतत होते. सगळीकडे आसमंतात धुराळा उडाला होता. त्यायोगे सूर्यबिंब अगदी लालसर दिसु लागले. बघता बघता सूर्य अस्ताला गेला व सगळी कडे काळकुट्ट होऊ लागले. गाव हळुहळु मागे पडत होते. मी आता अरण्यात प्रवेश केला होता. रस्ता साधारण होता. माझे ठिकाण अद्याप आले नव्हते. मला अंधाराची भीती वाटत नव्हती. मी गुणगुणतच चालत होतो. तोच कसलातरी आवाज कानी येत होता. बहुधा त्या रस्त्यावरुन चालणारे कोणी पांथस्थ असतील. हो, त्यांचाच आवाज येत होता. मी जसजसा पुढे जाऊ लागलो, तसतसा तो कोलाहल वाढु लागला. सभोवताली खूप अंधार होता. नीटसे दिसत नव्हते. पुढे मला भरपुर माणसे घोळक्याने उभी असलेली दिसली. मी त्यांच्या पर्यंत आलो असता मला वेगवेगळे संभाषण ऐकु येऊ लागले.....थांब मुला यापुढे जाऊ नकोस......अहो, हेच आपले मुक्कामाचे ठिकाण आहे. ....हुश्श, पोचलो एकदाचे.....बापरे काय लांबवर होते हे ठिकाण..... गुरुंनी सांगितल्याप्रमाणेच आहे हे.......थोडासा काळोख आहे इतकच काय ते........आता हा कोण पुढे चालला आणखी...... पोरगा वाटतो तो.......थांब मुला अरे हेच तुझे मुक्कामाचे ठिकाण आहे......आम्ही सगळेजण याठिकाणी थांबलो आहोत......पुढे जाऊ नकोस.... निबिड अरण्य आहे......शिवाय हिंस्र श्वापदांची भीती..... पायाला काटे बोचतील..... अरे बघ किती बोचरी हवा सुटली आहे........ थंडीने कुडकुडशील. थांब आमच्याबरोबर आनंद व्यक्त कर........ बघ आम्ही आनंदाने अगदी बेहोष होण्याच्या मार्गावर आहोत...... पोरा थांब अविचार करु नकोस....... आवाज आणखी वाढु लागला....... मीच मोठा साधु ..... मलाच खरा साक्षात्कार झाला आहे...... मी आता सच्चिदानंद स्वरुप बनलो आहे........... मला कशाचीही भीती नाही....... प्रत्यक्ष परमात्मा म्हणतात तो मीच...... मीच जगाचा पालनहार.......
मी त्यांचे बोलणे ऐकता ऐकता तसाच पुढे चालत होतो. मला माहिती होते की ते मुक्कामाचे ठिकाण नाही. ही माणसे चुकीच्याच जागेला मुक्कामाचे ठिकाण म्हणुन स्वतःची फसगत करुन घेत आहेत. वास्तविक पाहता एकतर ते थकलेले आहेत. किंवा, त्यांना आणखी पुढे जाण्याची भीती वाटत असावी.....काही असो मी पुढे चालतच रहाणार. काही झाले तरी.....
हळुहळ त्यांचा घोळका खुप मागे पडला. त्यांचा कोलाहल पण थांबला होता. मी त्यांपासुन खुप दुर व उंचीवर आलो होतो. माझ्या अंगात कसलातरी अनामिक उत्साह संचारला होता. मी चालतच होतो. बोचरी थंडी वाहत होती, पण त्याची जाणिव होत नव्हती. त्या काळोखात मी माझे स्वतःचेच आस्तित्व विसरलो होतो. माझे मन स्तब्ध झाले होते. मनात कोठलेही विचार येत नव्हते. मी तसाच पुढे पुढे जात होतो. तोच काय आश्चर्य क्षितिजावर तांबडं फुटलं होतं. सुर्यदेवाच्या आगमनासाठी सारे वातावरण आनंदित झाले होते. झुंजु मुंजु प्रकाश पडत होता. मी अंमळ मागे वळुन बघितले. बापरे मी किती उंचावर आलो होतो. ते गाव तो घोळका काहीच दिसत नव्हता.
तोच..... आकाशात सुर्यबिंब प्रगटले. सुर्यदेवास पाहुन माझी गात्रे पुलकित झाली. त्याचे दर्शन घेऊन मोठ्या श्रद्धेने डोळे बंद केले व त्यास ह्रदयात साठवु लागलो. ....... नतमस्तक झालो.....माझे भावांतर झाले...
....वत्सा डोळे उघड..... कोठुनसा आवाज कानी पडला..... मी डोळे उघडले तर काय..... साक्षात गुरुदेव समोर उभे.
माझी ब्रह्मानंदी टाळी लागली. .... बाळा हेच तुझे मुक्कामाचे ठिकाण.... या ठिकाणी खुप कमी पोचतात. बाकी तमोगुणास  देव मानुन सुखोपभोगात रममाण होतात. बाळा तुझे कल्याण असो.... तुझे मंगल असो.....
असे म्हणुन गुरुदेव समुद्राच्या लाटेप्रमाणे अंतर्धान पावले.

   ............डी सिताराम

गरीबी- एक काव्य

गरीबीचे भिषण चटके
मी आहेत अनुभवले
खाण्यास पुरते धड नसे
पोट पाठीस भिडलेले

बाप उपाशी, माय उपाशी
बहिण भाऊ सारे उपाशी
माय करी मोलमजुरी
बाप असाच कष्ट उपशी

शिकण्यासाठी पैका नव्हता
चिमटा पोटी पैका साठवी
खुप शिकुनी मोठे व्हारे
म्हणुनी आम्हा शाळा पाठवी

शिकुनी आम्ही मोठे बनलो
कृपा माय पितयांची
गरीबी नव्हे शाप कोणाचा
आहे ताकद दृढ मनाची

रंजुनी गांजुनी करुनी गोंधळ
दोष नशिबी देऊ नये
मार्ग काढुनी स्थिर चित्ताने
प्रयत्ना वाचुनी राहु नये

गतकालाचे भिषण दिवस
पुनः कधी ते येऊ नये
सन्मार्गाची कास धरुनी
सत्याचा मार्ग सोडु नये

   ...........डी सिताराम

शनिवार, ९ एप्रिल, २०११

दत्ता म्हणे

एक
खरा तोचि जाणा साधु।
नाही विकारांशी बाधु।।
करी परउपकार।
नाही सरती माघार।।
निंदा साहे जनी वनी।
स्थिर अंतरी लक्षुनी।।
दत्ता म्हणे असा साधु।
करी सकलांशी बोधु।।

दोन
आयुष्य हा खातो काळ।
कशी जीवा पडे भुल।।
हिच मायेची करणी।
नये कवणाच्या ध्यानी।।
संसारात रमे जीव।
तन मन अर्पी भाव।।
दत्ता म्हणे सावधान।
सोडी सोडी अभिमान।।

   .....डी सिताराम

मानव जन्म- एक काव्य

नाना विकार, वासना घेऊनी
मानव देही आला
गत जन्मींचे कर्म भोग तो
कसा विसरुनी गेला

जीवास सुखी करण्यासाठी
पैशापाठी धावतो
परि सुख कोठे, भास तयाचा
मृगजळापरी फसतो

कर्तृत्वाचे पंख लाऊनी
गगनी झेपावतो
तसाच व्यसने, छंद लाऊनी
अधःपतीत होतो

एक दुर्गुणी रावण होतो
एक सद्गुणी राम
कधी जिंकतो रावण दुर्गुण
कधी जिंकतो राम

खरी लढाई मनात होते
भाव भावनांची
नसे शेवट या युद्धाचा
ठाऊक नसे विरंची

   .....डी सिताराम

सुनामी

जपानच्या सागर किनारी
धरणीकंप झाला
लाटा उसळल्या गगनचुंबी
काल स्तब्ध झाला

नसे कोणाला माहित यातले
सारे सुरळीत होते
उद्याची चिंता मनी ठेऊनी
व्यवहार करीत होते

साऱ्या जगाशी स्पर्धा तयांची
विसरुनी गतकाल
ताठ मानेने उभा राहीला
होता उषःकाल

परि तयांचे नशिबी अजुनी
भोग सरले नव्हते
होऊनी काळ कृतांत लाटा
सारे केले वाहते

होते नव्हते वाहुन गेले
संसार उघडा झाला
पाहुनी करुण दृश्य तयांचे
यमही थरकापला

      ......डी सिताराम

अण्णा हजारे- एक तुफान

सन्मार्गाने मागता येते
लढाई झगडा न करता
सारा देश येतो साथीला
अण्णा हजारे नेता

राजवट ही ढवळुन गेली
हादरले राजकारणी
भ्रष्टाचाराला भय सुटले
जणु थरथरे धरणी

बापुजींच्या मार्गावरती
अण्णा चालत होते
त्यांच्या मागुन सारी जनता
अनुशिलन करते

असा स्वच्छ सद्गुणी नेता
साऱ्या जगाने पाहिला
वंदन करुनी तया मुर्तीस
साथ देऊ तयाला

      .........डी सिताराम

गुरुवार, ७ एप्रिल, २०११

दत्ता म्हणे

गुरु कृपेची पहाट।
राम सर्वत्र चोखट।।
राम शरीरी बाहेरी।
राम राही चराचरी।।
राम चेईले निदेले।
रामे घरकुल केले।।
राम जळी स्थळी काष्ठी।
एक्या मुखी करा गोष्टी।।
दत्ता शरण शरण।
राम राजीव लोचन।।

   .......डी सिताराम

दत्ता म्हणे

एक
संत उदार उदार।
सारा आटवी संसार।।
दृश्यजगाचा नाश केला।
सत्य स्वरुपे पातला।।
मजविण कोणी नाही।
अनुभव हाचि येई।।
दत्ता म्हणे सांगो किती।
ऐशी संतांची महती।।

दोन
गुरु चरणांची शोभा।
भोळा राजा असे उभा।।
यांशी नाही मानपान।
दिले नामाचे साधन।।
नामरुप ऐक्य करी।
भवव्याधी दूर करी।।
दत्ता म्हणे माझा भाव।
गुरु जाहला स्वभाव।।

तीन
संतसमागमु धरावी आवडी।
जाशी पैलथडी भवसिंधु।।
संतांचे वचन अंतरी लक्षुनी।
आपुल्या जीवनी मुक्त होशी।।
संत हाची बाप संत हाची माय।
भक्तालागी सोय सर्वकाळी।।
संत उपदेश हाची गीता सार।
कैवल्याचा भार दत्ता म्हणे।।

चार
करा नामाचे साधन।
तिच गुरुसेवा जाण।।
नाम सुलभ सोपे रे।
नामे काळ थरथरे।।
करा बापांनो उच्चार।
तयाविण ना उद्धार।।
दत्ता म्हणे झालो धीट।
मार्ग पाहिला चोखट।।

पाच
नाम सोपे नाम सोपे।
सरतील विघ्ने पापे।।
नाही आणिक साधन।
देव पहायाशी जाण।।
हरिप्राप्तीचे लक्षण।
पांडुरंग नाम जाण।।
दत्ता म्हणे घेई नाम।
पुढे उभा घनःश्याम।।
   
      ...... डी सिताराम

बुधवार, ६ एप्रिल, २०११

आत्मज्ञान याचे नाव

आत्मा जाणावा विवेके। ज्ञानाज्ञान कौतुके।
अव्दैताचे रुप फिके। आत्मज्ञानयाचे नाव।।

झळाळे सम्यक ज्ञान। समतेची मति जाण।
तटस्थचित्त होऊन। आत्मज्ञान याचे नाव।।

आत्मा धवळ असे जाण। नसे विकार अधिन।
चिदाकाशाची ही खूण। आत्मज्ञान याचे नाव।।

द्रष्टा-दृष्य-दर्शन। जैशी कर्पुर ज्योत जाण।
वेगेसी गेली नासोन। आत्मज्ञान याचे नाव।।

शमदमादि योजना करावी। ब्रह्मैक्याची कास धरावी।
सुमति कदा न संडावी। आत्मज्ञान याचे नाव।।

नाश करा कर्माशय। जन्मोजन्मीचे ते भय।
तोडा भवभ्रम न्याय। आत्मज्ञान याचे नाव।।

नका धरु एकपण। सांडी अवगुण लक्षण।
मनी राहो शुद्धज्ञान। आत्मज्ञान याचे नाव।।

आत्मैक्याची वृत्ती जाण। ओळख आपणा आपण।
करा ईशवरी चिंतन। आत्मज्ञान याचे नाव।।

ब्रह्मत्राटक करावे। मनी स्वरुपी भरावे।
सर्व अहित त्यजावे। आत्मज्ञान याचे नाव।।

करा विकार शमन। उद्धरी आत्म्याशी जाणुन।
पहावे करावे मौन। आत्मज्ञान याचे नाव।।

मनी असावे निर्भय। करा दुर्बलांची सोय।
मति ठेवावी सुन्याय। आत्मज्ञान याचे नाव।।

चराचरात ईश्वर। व्हारे जाणुनी निर्भर।
नको देवावरी भार। आत्मज्ञान याचे नाव।।

दृष्य प्रपंचाचे भुत। करुनिया वरी मात।
जाणुनिया सुषुप्तीत। आत्मज्ञान याचे नाव।।

दत्ता झाला सावचित्त। क्षणभंगुरत्व ज्ञात।
करी आपुलाले हित। आत्मज्ञान याचे नाव।।

 ........... डी सिताराम


दत्ता म्हणे


एक
उदासिन वृत्ती, धरावी अंतरी।
समत्वे बाहेरी, निजरुप।।
मानपान नेणे, नेणे शत्रु-मित्र।
जाणा तो पवित्र, संसारात।।
मोह ममतेचे नाही पाश मनी।
केवळ उन्मनी भोगतसे।।
दत्ता म्हणे ऐसा आचरी जीवन।
वंदिन चरण जिवेभावे।।

दोन
सबाह्य अंतरी विठ्ठल कोंदला।
सोहळा देखला निजरुपी।।
भक्त काजासाठी धरीले सगुणे।
परि व्यापकपणे नटलाशी।।
देवादिका ना कळे तुझे हे स्वरुप।
जाणला मी बाप विटेवरी।।
दत्ता म्हणे ऐसा राजा कनवाळु।
करितो सांभाळु भक्तजना।।

तीन
नलगे नलगे मुक्तिचा सोहळा।
आवडे कृपाळा येरझार।।
जन्मोजन्मी तुझा होईन मी दास।
हेचि माझी आस पुरवावी।।
नामघोष कानी आवडतो देवा।
पडे याचा हेवा ब्रह्मादिका।।
दत्ता म्हणे तुचि प्राणाचा विसावा।
माधव केशवा पद्मनाभा।।
चार
प्रभु तुझी माया न कळे कवणा।
व्यापक विचक्षणा दाखविशी।।
जरी तु व्यापिले सकळ जगत।
असे गुणातित रुप तुझे।।
साऱ्या जगताचा तुची बा विसावा।
घडे बद्ध जीवा आत्मबोध।।
दत्ता म्हणे जाणा भक्त तोची खरा।
मायेचा पसारा पार करी।।

पाच
सकल भ्रमले मायेत रमले।
मन भोगा गुंतले विषयांच्या।।
भाव भक्ति ठाव नाही जयापरी।
अधिनता परि वासनेच्या।।
संत वचनांशी वावडे तयाशी।
नसे तयापाशी नारायण।।
दत्ता म्हणे व्हारे सावध सावध।
करा आत्मबोध गुरुपाशी।।

सहा
सद्गुरु कृपा बंधनाशी तोडी।
मायेशी मरोडी भवताप।।
असे भाग्यवंत दैवाचे दैवाचे।
पंढरीरायाचे दास आम्ही।।
बंधन तोडिले उकलोनी गाठी।
तोचि जगजेठी डोळा दिसे।।
दत्ता म्हणे ऐसी सद्गुरुंची लीला।
भोगतसे सोहळा आपणची।।

सात
पाहे पाहे विठु पाहे।
सर्वाभुति वास राहे।।
ज्ञानदृष्टी दाटे डोळा।
असा पवित्र सोहळा।।
असे सगुण बरवे।
प्रेमे चराचरी राहे।।
दत्ता म्हणे पाहा याशी।
वास आपणया पाशी।।

आठ
पाहता पाहता एकरुप झालो।
दशदिशा ठालो कौतुकाने।।
बोलता बोलता मौनाशी पावलो।
श्रवणाशी आलो अनाहत।।
सबाह्य अंतरी एक निजबोध।
नाशियेली बाध विषयांची।।
दत्ता जाणे ह्रद सकल जीवांचे।
एक कैवल्याचे रुप जगी।।

नऊ
जगत संसार मृगजळ भासे।
तया मुळी दिसे ब्रह्मरुप।।
अविद्या ही जाणा विस्तार जगाचा।
आत्मज्ञाने साचा बिजनाश।।
वासना निमाली ठाईची ह्रदयी।
तेणे रुप पाही ऐक्यरसी।।
दत्ता म्हणे जळे कर्माचे बंधन।
हाचि जन्म जाण शेवटला।।

दहा
विश्वरुप जे पार्थाशी।
तेचि दाविले आम्हासी।।
धन्य धन्य गुरुराया।
तुज ओवाळिन काया।।
अनुग्रहे केली मात।
प्रेमे झालो गुणातित।।
त्रिपुटी ही एक झाली।
ऐक्य कौतुके पाहिली।।
दत्ता पाही निजरुप।
वसे चराचरी बाप।।

अकरा
गोड तुझे नाम देवा।
हरि मुरारी केशवा।।
नसे बंधन काळाचे।
स्मरे पाय विठोबाचे।।
ध्यानी मनी वसे हरि।
स्वप्न जागृती बाहेरी।।
दत्ता म्हणे अनुभवा।
याशी जाणा नित नवा।।

बारा
जन्म होता मुक्त झालो।
हरि भजनांशी आलो।।
आवडिने घ्यावे नाम।
तेणे तुष्टे घनःश्याम।।
जन्मोजन्मी घडो सेवा।
पडे ब्रह्मादिका हेवा।।
दत्ता सांगे सकलांशी।
प्रेमे स्मरा रे हरिशी।।

तेरा
नसे मी मोठा कोणी।
या साऱ्या जनीवनी।।
संत चरणांचा दास।
मी राहतो उदास।।
विकारांचा मी कल्लोळ।
पडे जीवा कशी भुल।।
मी दास संता पायी।
दत्ता म्हणे उगा राही।।

चौदा
करा सद्गुरु सोयरा।
झणी त्याची कास धरा।।
तोचि तारक तारक।
पडे कळीकाळा धाक।।
आत्मज्ञान घडवितो।
देहभोग नासवितो।।
दत्ता म्हणे जागा होई।
सद्गुरु शरण जाई।।

पंधरा
राम तोचि आत्माराम।
सकल जीवांचा आराम।।
राम ध्याई राम गाई।
राम सर्वाभुति राही।।
रामा गोविंदा माधवा।
हाचि योग्यांचा विसावा।।
दत्ता म्हणे राम म्हणा।
नाही पुण्याची गणना।।

सोळा
गुरु कृपेची पहाट।
चारी वाचा एकवट।।
रामनाम घेता वाचे।
नाशे बिज हे कर्माचे।।
रामनाम आदिजप।
हरवितो भवताप।।
दत्ता सांगे सकलांशी।
प्रेमे स्मरा श्रीरामाशी।।

सतरा
जन्मा आलाशी रे नरा।
घेई रामनाम खरा।।
तेणे तुटेल बंधन।
करी बापा हे साधन।।
नसे क्षण भरवसा।
पुढे काळा हाती फासा।।
दत्ता म्हणे वेगु करा।
रामनाम मनी स्मरा।।

अठरा
नाम फुकाचे फुकाचे।
तरी का न घेई वाचे।।
मोहपाशा गुंतियेला।
कामभोगा आकळीला।।
वाणी निंदती सज्जना।
लाज कशी नये मना।।
दत्ता म्हणे मार्ग सोपा।
तरी का न दिसे बापा।।